आधी धारगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करा, त्यानंतरच वैनगंगा–नळगंगा प्रकल्प – खा. डॉ. प्रशांत पडोळे
भंडारा.– भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली धारगाव उपसा सिंचन योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. जोपर्यंत धारगाव उपसा सिंचन योजना (भाग 1 व 2) पूर्ण होत नाही, तोपर्यंत वैनगंगा–नळगंगा प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, असा ठाम इशारा भंडारा–गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीश महाराज यांना पत्र पाठविले आहे. पत्रात खासदार डॉ. पडोळे यांनी नमूद केले आहे की, जर धारगाव उपसा सिंचन योजना वेळेत पूर्ण झाली असती, तर स्थानिक शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला असता. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष करून केवळ प्रसिद्धीसाठी नवीन योजना जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे, जी चुकीची आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, आधी जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने प्राधान्याने धारगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करूनच पुढील प्रकल्पांना मंजुरी द्यावी.
शेतकऱ्यांना आपसात भिडविण्याचा प्रयत्न – आरोप
खासदार डॉ. पडोळे यांनी सरकारवर गंभीर आरोप करीत म्हटले की, दोन्ही योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांना आपसात भिडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने विकासाचा स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवावा आणि निधीचा योग्य व वेळेवर वापर करावा, जेणेकरून प्रकल्पांचा खर्च वाढणार नाही.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
