top of page

५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करु ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 23, 2019
  • 2 min read

दोंडाईचा :- (वृत्तसंस्था) सलग १५ वर्ष राज्यात सत्ता भोगून केवळ भ्रष्ट्राचार करणार्‍यांना आपण दूर केले. आघाडीला जे १५ वर्षात जमले नाही ते पाच वर्षात करून दाखविले, जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असून पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथे केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेच्या दुसर्‍या टप्प आज धुळे जिल्हयापासून सुरूवात झाली. धुळे येथे महारॅली काढण्यात आली. त्यानंतर दोंडाईतील सभेला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल, प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंग ठाकूर, खा.डॉ.सुभाष भामरे, दोंडाईचा पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. नयनकुंवरताई रावल, शिंदखेडा शहराच्या नगराध्यक्षा सौ.रजनी वानखेडे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, कामराज निकम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणतात राज्यातील सिंचन प्रकल्पांना गेल्या १५ ते २० वर्षात चालना मिळालेली नव्हती. परंतु गेल्या पाच वर्षात राज्यातील अनेक सिंचन प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत त्यांना चालना देण्याचे काम केलेले आहे. धुळे जिल्हयातील सुलवाडे, जामफळ योजनेला गेल्या १५ वर्षापासुन मंजूरी मिळून देखील त्याचे काम करण्यात आले नव्हते. मंत्री जयकुमार रावल आणि खा. डॉ.भामरे यांनी पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हजारो कोटी रूपये या योजनेसाठी आणून हे काम सुरू केले आहे, लवकरच धुळे जिल्हयाचे स्वप्न साकार करणार आहोत. याशिवाय पश्चिम वाहिनी नदयांचे पाणी महाराष्ट्रात आणून त्यातून १६७ टी.एम.सी.पाणी खान्देशासाठी देणार असून त्याच्या कामाला लवकरच सुरवात करणार आहोत, एवढेच नव्हे तर राज्यात १५ वर्षात केवळ १० हजार कि.मीचे रस्ते त्यांनी केले होते, केवळ ५ वर्षात ३० हजार कि.मी.चे रस्ते तयार केले, सात लाख ग्रामीण भागातील लोकांना आणि पाच लाख शहरी भागातील लोकांना हक्काचे घर मिळवून दिलेले आहे, सन २०२२ पर्यंत राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कटीबध्द असून एवढेच नव्हे तर १८ हजार गावांना पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधी दिलेला असून त्याची कामे देखील सुरू आहेत. आज शहरांबरोबरच ग्रामीण भाग वेगाने बदलत आहे.पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षात असतांना संघर्ष यात्रा काढत होतो, सत्तेत असतांना आम्ही केलेली कामे जनतेसमोर मांडण्यासाठी संवाद यात्रा काढली. पाच वर्षात राज्यात जी लोकोपयोगी कामे केली ती जनतेसमोर मांडून जनतेचा जनादेश घेण्यासाठी ही यात्रा काढली असून गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एक केले आहे.ना.जयकुमार रावल म्हणतात की, राज्यात निधी वाटप करीत असतांना आघाडीच्या काळात सातत्याने अन्याय होत होता, पंरतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कायमच पहिल्या स्थानावर ठेवून आपली सर्वच कामे मार्गी लावण्यासाठी निधी दिलेला आहे, गेल्या ७० वर्षात ज्या कामांची वाट पाहत होतो, कॉंग्रेसच्या काळात सर्वात शेवट धुळे आणि नंदूरबारचा विचार होत होता, पंरतू युतीच्या काळात नंबर पहिला लागतो म्हणून खानदेशना लोके ज्याना मांगे राहतस त्याले पक्का साथ देतस अशा शब्दात जयकुमार रावल यांनी उपस्थितांची मने जिंकली.

Comments


bottom of page