प्रवीण सलामे यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी राम जाधव यांचे अमरण उपोषण सुरू
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
घाणमुख ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.सदर प्रकरणातील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर याबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीच्या अहवालामध्ये कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यासह एकूण पाच जण दोषी असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, अहवाल सादर होऊनही संबंधितांवर कोणतीही प्रशासकीय किंवा फौजदारी कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर दोषींना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी राम जाधव यांनी अमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.दरम्यान, जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही राम जाधव यांनी दिला आहे. या उपोषणाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
