अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय २०२५’ पुरस्कार जाहीर
CT India News
प्रतिनिधी जुबेर शाह
साखरखेर्डा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय २०२५’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा मानाचा पुरस्कार प्रख्यात मराठी कवी व निवेदक अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे. हा संग्रह अथर्व पब्लिकेशन, जळगाव यांनी प्रकाशित केला आहे.
राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखाध्यक्ष दिपक स्वामी आणि प्रा. धर्मवीर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी ८ मार्च रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे साहित्य संमेलन ईश्वरपूर येथे होणार असून या वेळी प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रज्ञा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अजीम नवाज राही यांच्या कवितेतून शेतकरी, कामगार, शोषित व सामान्य माणसांच्या जीवनातील वास्तव प्रभावीपणे मांडले जाते. प्रयोगशील भाषा, वस्तुनिष्ठ मांडणी आणि मानवी मूल्यांचे भान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत.
